टी-20 रॅंकिंगमध्ये स्मृती मानधना तिसर्या स्थानी:
- भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत शानदार कामगिरी करत आयसीसी महिलांच्या ट्वेन्टी-20 क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोच्च तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

- एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त करणाऱ्या मानधनाने हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या मानधनाने तीन सामन्यांच्या या मालिकेत एकूण 72 धावा जमवल्या. त्यामुळेच तिच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा झाली आहे.
- गोलंदाजांमध्ये राधा यादव हिने पाचव्या स्थानी मजल मारली आहे. एकता बिश्त हिने 56वे स्थान प्राप्त केले आहे. अनुजा पाटील हिने 35व्या क्रमांकावरून 31व्या स्थानी झेप घेतली आहे.
- इंग्लंडच्या डॅनियल वॅट हिनेही कारकीर्दीतील सर्वोत्तम 17वे स्थान प्राप्त केले आहे. वॅट हिने या मालिकेत 123 धावा फटकावल्या. टॅमी ब्यूमाँट आणि कर्णधार हीदर नाइट यांनीही अनुक्रमे 26वे आणि 33वे स्थान मिळवले आहे.
समाजमाध्यमांवरील प्रचारालाही ‘आचारसंहिता’:
- निवडणूक प्रचार आणि वातावरण निर्मितीत समाजमाध्यमांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने समाजमाध्यमांसाठी काही निकष निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांची (सोशल मीडिया अकाऊंट्स) माहिती द्यावी लागणार आहे.
- निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, समाजमाध्यमांवरील सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांकडून येणाऱ्या जाहिरातींची पडताळणी करावी, असे आयोगाने गुगल, फेसबुक, ट्विटर आणि यू-टय़ुब यांना सांगितले आहे.
- समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींच्या संबंधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याचीही (ग्रिव्हन्स ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवरील प्रचारांच्या जाहिरातींचा सर्व खर्च निवडणूक खर्चात मोजला जाणार आहे.
- व्देषपूर्ण भाषणांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व बडय़ा कंपन्यांनी दिले असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. निवडणुकीच्या दिवसांतील सर्व कार्यक्रमांवर माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने कडक देखरेख ठेवली जाणार आहे.
चंद्राच्या प्रकाशित बाजूवर पाण्याच्या रेणूचे संशोधन:
- नासाच्या ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर (एलआरओ) या अवकाशयानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी चंद्रावर प्रकाशित भागात पाण्याचे रेणू शोधले आहेत. आगामी चांद्र मोहिमांसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

- ल्युनर रेकनसान्स ऑर्बिटर या अवकाशयानावर लावलेल्या लायमन अल्फा मॅपिंग प्रोजेक्ट या उपकरणाने चंद्रावरील पृष्ठभागावरील पाण्याच्या कणांचा थर टिपला असून तेथे दिवसाही पाण्याचे अस्तित्व आहे असा त्याचा अर्थ असल्याचे ‘जिओफिजिकल रीसर्च लेटर्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.
- गेल्या दशकापर्यंत वैज्ञानिक असे गृहीत धरून चालले होते, की चंद्र हा कोरडा आहे व तेथील पाणी प्रकाश असलेल्या भागात नसून अंधाऱ्या भागातील विवरात विशेष करून तेथील ध्रुवीय प्रदेशात आहे. मात्र, अलीकडेच नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर जेथे प्रकाश आहे तेथे पाण्याचे थर शोधून काढले आहेत.
- पाण्याचे हे रेणू तेथील मातीला चिकटलेले दिसून आले. चंद्रावरचा हा भाग जसा तापत जातो तसे हे पाणी वरच्या भागातून खाली येते. चंद्रावरील जलचक्राचे आकलन त्यातून शक्य झाले असून आगामी मोहिमात मानवासाठी तेथील पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असे प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिटय़ूट या संस्थेचे वैज्ञानिक अमंदा हेंड्रिक्स यांनी म्हटले आहे.
खनिज तेलाचे दर वाढण्याची शक्यता:
- ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल व डिझेलचे दर वाढण्याची शक्यता असून तेल मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी तेलाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सौदी अरेबियाला सक्रिय भूमिका पार पाडण्याची विनंती केली आहे. सौदी अरेबिया हा तेलाचा सर्वात मोठा दुसरा निर्यातदार देश आहे.
- पेट्रोल व डिझेलचे दर एक महिन्यात लिटरला 2 रूपये वाढले असून अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार युद्ध संपण्याची चिन्हे असून ओपेकचा मित्र देश असलेला रशिया खनिज तेलाचा पुरवठा कमी करणार आहे, त्यामुळे किंमती वाढणार आहेत.
- प्रधान यांनी तेलाच्या वाढत्या दरांचा मुद्दा सौदी अरेबियाचे तेल मंत्री खालीद अल फलिह यांच्याशी चर्चेत उपस्थित करून दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीबाबत प्रधान यांनी चिंता व्यक्त केली असून यात आता सौदी अरेबियाने भूमिका पार पाडावी असे म्हटले आहे.
- नुकतेच जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, की प्रधान यांनी तेलाचा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाला साकडे घालून तेलाच्या किमती वाढण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे.
- सौदी अरेबिया हा तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा निर्यातदार देश असून 2017-18 मध्ये भारताने सौदी अरेबियाकडून 36.8 दशलक्ष टन तेल आयात केले होते, ते देशाच्या आयातीच्या 16.7 टक्के होते.
कर्करोगावरील औषधांच्या किमती घटणार:
- केंद्र सरकारच्या निर्देशानुसार औषध कंपन्यांनी कर्करोगावरील औषधांच्या किमतीत कपात करण्याचा निर्णयघेतला आहे. त्यामुळे कर्करोगावरील 390 औषधांच्या किमती 87 टक्क्यांनी कमी होणार आहेत. हे सुधारित दर लवकरच लागू करण्यात येणार असल्याने, यामुळे कर्करोगग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- केंद्र सरकारकडून 42 कर्करोग विरोधी औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात या औषधांवरील बाजार मूल्य 30 टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आले. त्यानंतर, औषध उत्पादकांना औषधांचे प्रथम विक्री दर निश्चित करण्याचे निर्देश देत, सुधारित किमती मागविल्या होत्या.
- औषध कंपन्यांनी सरकारच्या या निर्देशानुसार कर्करोगावरील औषधांच्या किमतीची सुधारित यादी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाकडे दिली असून, ही यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
- तर या यादीत 390 औषधांचा समावेश आहे. कर्करोगावरील औषधांच्या किमतीत कपात झाल्याने जवळपास 800 कोटी रुपयांच्या सरकारी निधीची वार्षिक बचत होणार आहे.
दिनविशेष:
- 1886 या वर्षी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
- पंडिता रमाबाई यांनी मुंबई सन 1889 मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
- सन 1984 मध्ये ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
- 1999 या वर्षी नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
- कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. सन 2001 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
No comments:
Post a Comment