रिझव्र्ह बँक आणि सरकारमध्ये समेट:
- सरकार आणि बँक नियामकामध्ये संघर्ष उत्पन्न करणारा रिझव्र्ह बँकेकडील अतिरिक्त रोकडतेचा मुद्दा निकालात काढण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय अखेर मध्यवर्ती बँकेच्या तब्बल नऊ तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आला.

- रिझव्र्ह बँकेकडील अतिरिक्त रक्कम सरकारला कशी हस्तांतरित करता येईल याबाबतचे मार्गदर्शन ही समिती करेल, असे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
- रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या मुंबईतील मुख्यालयात झाली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल नऊ तास चालली. बैठकीला 18 पैकी बहुतांश सदस्य उपस्थित होते.
- अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड असून त्याच्या सुरळीत पुरवठय़ासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यावर बैठकीत सहमती झाली. निवडक सरकारी बँकांच्या राखीव निधी प्रमाणाबाबत शिथिलता देण्यावरही बैठकीत निर्णय झाला. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी व्यापारी बँकांना कर्ज पुनर्रचना करण्यास परवानगी देण्याचा निर्णयही यावेळी झाला.
वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम बदलणार:
- देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम अखेर वीस वर्षांनंतर आता बदलणार असून नव्या आराखडय़ात नीतिमूल्ये, संवादकौशल्ये, अवयवदानाबाबत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
- वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होणारी नवी संशोधने, आरोग्यक्षेत्राच्या बदललेल्या गरजा, नवे आजार हे सगळे दरवर्षी शिक्षकांच्या पातळीवर, प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात असले तरी मूळ अभ्यासक्रम आराखडय़ात गेल्या वीस वर्षांत बदल झाला नव्हता.
- आता मात्र भारतीय वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचा आराखडा परिषदेने जाहीर केला असून पुढील वर्षीपासून अभ्यासक्रम अमलात येईल.
- नीतिमूल्ये, दृष्टिकोन, संवाद या घटकांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. अनेकदा डॉक्टरांकडून माहिती मिळत नाही, रुग्णांशी संवाद नसतो अशा तक्रारी रुग्ण आणि नातेवाईकांकडून करण्यात येत असतात.
- डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संवादाचा अभाव असल्यामुळे रुग्णालयांमध्ये अनेकदा वादंग होत असतात. त्या पाश्र्वभूमीवर नव्या अभ्यासक्रमात संवाद कौशल्ये, मूल्ये यांचा समावेश करण्यात आला आहे.
कॉफीमुळे स्मृतिभ्रंश व कंपवाताला अटकाव:
- सकाळच्या कॉफीचा कप हा नित्यनेमाचा भाग असला तरी त्यामुळे अल्झायमर (स्मृतिभ्रंश) व पार्किन्सन (कंपवात) हे दोन्ही रोग होण्याची जोखीम कमी होते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
- वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की कॉफीमुळे सकाळी सकाळी ऊर्जा तर वाढतेच, पण इतरही फायदे होतात. कॉफी सेवन केल्याने अल्झायमर व पार्किन्सनचा धोका कमी होतो.

- कॅनडातील क्रेमबिल रीसर्च इन्स्टिटय़ूटचे डोनाल्ड विव्हर यांनी सांगितले, की कॉफीमुळे असा फायदा होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वयपरत्वे मेंदूची हानी होत जाते, त्यामुळे बोधनात्मक अडचणीही निर्माण होतात. त्यात कॉफीतील कोणती संयुगे फायद्याची ठरतात हे पाहणे महत्त्वाचे होते.
- लाइट रोस्ट, डार्क रोस्ट व डिकॅफिनेटेड डार्क रोस्ट अशा तीन प्रकारच्या कॉफीवर प्रयोग करण्यात आले. सुरुवातीच्या प्रयोगात कॅफिन असलेल्या व नसलेल्या डार्क रोस्ट कॉफीचे परिणाम सारखेच दिसून आले, असे क्रेमबिल रीसर्च इन्स्टिटय़ूटचे रॉस मॅन्सिनी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी नंतर वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला असता कॉफीचा हा चांगला परिणाम कॅफिनमुळे नसून फेनीलिंडेन्स या घटकांमुळे असल्याचे दिसून आले.
- तर कॉफी बीन्स भाजल्यानंतर त्यात हा घटक तयार होतो. या फेनीलिंडेन्समुळे बिटी अमायलॉइड व ताऊ हे प्रथिनांचे दोन्ही प्रकार रोखले जातात. या दोन प्रथिनांचे मेंदूत थर साचून पार्किन्सन व अल्झायमर हे रोग होतात. कॉफी बीन्स भाजल्याने त्यातील फेनीलिंडेन्स वाढतात, त्यामुळे जास्त भाजलेली कॉफी ही कमी भाजलेल्या कॉफीपेक्षा जास्त परिणामकारक ठरते.
आता महिला बचतगटांची उत्पादने ‘अॅमेझॉन’वर:
- महिला बचतगटांची उत्पादने विकण्याची हमखास ठिकाण म्हणजे आठवडी बाजार किंवा विक्रीप्रदर्शने. पण आता ऑनलाईन खरेदी-विक्रीचा जमाना असल्याने बचतगटही बदलले आहेत. त्यांनी आपली उत्पादने ‘ऑनलाईन‘ विकण्यास सुरूवात केली आहे. बचतगटांची सुमारे 200 उत्पादने ‘अॅमेझॉन’वर आहेत. पहिल्या टप्प्यात 25 टक्के उत्पादनांची विक्रीही झाली आहे.
- राज्यात महिला बचतगटांच्या चळवळीने चांगलेच मूळ धरले आहे. शहर आणि ग्रामीण भागातही बचगटांचे जाळे विकसित होत आहे. बचतगटांच्या वस्तूंना मागणीही आहे, परंतु प्रश्न आहे तो बाजाराचा. त्यासाठी पारंपरिक आठवडी बाजारात या वस्तूंची विक्री करावी लागते किंवा अधून मधून भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे लागते. परंतु ई-कॉमर्सचा काळ सुरू झाल्यामुळे बचतगटांच्या वस्तूंना विक्रीव्यासपीठ मिळाले आहे.
- राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्यावतीने विशेषत: महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) डी-मार्ट, रिलायन्स आदी मॉलमध्ये बचतगटांच्या वस्तू विक्रीला ठेवल्या आहेत.
महाराष्ट्राला राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद:
- महाराष्ट्राच्या मुलींनी गतविजेत्या तमिळनाडूचा 83-66 असा पराभव करून कांगडा येथे झालेल्या 45व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
- पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवलेल्या तमिळनाडूची दुसऱ्या सत्रात कोंडी करण्यात यश आल्याने महाराष्ट्राचा विजय निश्चित झाला. भूमिका सर्जे, मानसी निर्मलकर आणि अदिती पारगावकर यांनी सुंदर समन्वय राखत प्रतिस्पध्र्याच्या बचावक्षेत्रात वारंवार मुसंडी मारून बास्केट केल्याने तमिळनाडूच्या खेळाडू हतबल ठरल्या होत्या. त्यातच समीक्षा चांडक आणि तन्वी साळवे यांनी बचावात उत्कृष्ठ कामगिरी बजावून तमिळनाडूला केवळ 7 गुणांवर रोखले आणि सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.
- मध्यंतराच्या 43-27 अशा मोठय़ा आघाडीसह पुनरागमन केलेल्या शोमीराने आक्रमणाची बाजू सांभाळत संघाची आघाडी 67-38 अशी वाढवण्यास मदत केली. शेवटच्या सत्रात 5 फाऊल्समुळे शोमीरा, समीक्षा आणि तन्वी साळवेला मैदानाबाहेर जावे लागल्याने तमिळनाडूच्या खेळाडूत चैतन्य आले आणि त्यांनी विजेत्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
- कर्णधार साधनाने सामन्याची सूत्रे हाती घेत भराभर गुण नोंदवण्याचा सपाटा लावला. तमिळनाडूने शेवटच्या सत्रात विजेत्यांना 16 गुणांवर रोखत 28 गुण नोंदवले. त्यात कर्णधार साधनाचा वाटा 20 गुणांचा होता. आघाडी भराभर कमी होत असताना धारा फाटे आणि रिचा रवीने संयमी खेळी करत महाराष्ट्राचा विजय सुकर केला.
दिनविशेष:
- 20 नोव्हेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बाल दिन‘ आहे.
- म्हैसूर चा राजा शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1750 मध्ये झाला होता.
- थॉमस अल्वा एडिसन यांनी सन 1877 मध्ये ग्रामोफोन चा शोध लावला.
- सन 1994 मध्ये भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली
No comments:
Post a Comment