मुंबई जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर :
- भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसोंदिवस वाढतानाच दिसत आहे. मात्र जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली. या यादीमधील पहिले नाव
ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. या यादीनुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. - तर अपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे.
- जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार मुंबईमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 65 टक्के अधिक वेळ लागतो असे म्हटले आहे.
- तसेच मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली. सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 57 टक्के अधिक वेळ लागतो.
स्वतःच्या अंतराळ स्थानक निर्मितीची भारताची योजना :
- महत्वाकांक्षी चांद्रयान-2 चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.
- तर हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केले आहे.
- अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत असल्याचे डॉ. सिवन यांनी सांगितले.
- दरम्यान, आण्विक ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच म्हटले की, भारताने 2022 मध्ये आपल्या 75 व्या स्वातंत्र्यवर्षपूर्तीनिमित्त अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली असेल. यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून तयारीही सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
- त्याचबरोबर चांद्रायन-2 नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.
पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं
कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने ‘जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक 2019’ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल. - केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक 2019 ला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर कॅबिनेटची ही पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारच्या नजीकच्या व दुरगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.
बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन :
- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची इंग्लंडच्या बँक ऑफ इंग्लंड या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
- बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत राजन यांचे नाव सर्वात पुढे आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था अडचणीत असताना मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरपदासाठी राजन यांच्या नावाचा विचार होणे, ही महत्त्वाची बाब आहे.
- बँक ऑफ इंग्लंड 325 वर्षांपूर्वी स्थापन झालेली बँक असून, तिचे गव्हर्नरपद लवकरच रिक्त होणार आहे. अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केलेले रघुराम राजन ब्रेक्झिटमधून निर्माण झालेल्या अडचणींतून मार्ग काढू शकतील, असे बोलले जात आहे.
- तसेच रघुराम राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. राजन 2003 ते 2006 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत मुख्य अर्थतज्ज्ञ होते.
बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती :
- कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेला मलेशियाचा बॅडमिंटन स्टार ली चोंग वेई याने निवृत्ती जाहीर केली.
- तर कारकीर्दीत अनेक जेतेपदाचा मानकरी राहिलेल्या 36 वर्षांच्या लीची आलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.
- प्राथमिक स्तरावर असलेल्या कर्करोगावर त्याने तैवानमध्ये उपचार करून घेतले. कोर्टवर पुनरागमनासाठी तो फारच उत्सुक होता.
दिनविशेष :
- 14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.
- महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.
- भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.
- ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
No comments:
Post a Comment