अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम :
- पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. त्यांची या पदावरील दुसरी कारकीर्द पाच वर्षांची असून ती पूर्वलक्षी प्रभावाने 31 मेपासून सुरू झाली.
- तर सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींच्या विश्वासू सहकार्यामध्ये डोवाल यांचा समावेश होतो. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांच्या फेरनियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.
- 2014 साली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला होता. फेरनियुक्ती झालेले ते पहिलेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
- भारताचे माजी परराष्ट्र सचिव व आता परराष्ट्रमंत्री बनलेले एस. जयशंकर हे प्रशासकीय कारकीर्दीच्या दृष्टीने अजित डोवाल यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत.
- अजित डोवाल हे 1968च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी सुमारे 33 वर्षे गुप्तचर अधिकारी म्हणून जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत, पंजाबमध्ये काम केले. सैन्याकडून देण्यात येणार्या कीर्ती चक्राने सन्मानित झालेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदावरून ते 2005 साली निवृत्त झाले.
लवकरच 5G स्पेक्ट्रम्सचा लिलाव होणार :
- चालू वर्षातच सरकार 5G स्पेक्ट्रम्सचा लिलाव करणार आहे. दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली.
- त्यांनी दूरसंचार मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, सरकारी दूरसंचार कंपन्या एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्यांची परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- दूरसंचार कंपन्यांना एकमेकांच्या सहकार्याने आणि व्यावसायिक दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. चालू वर्षामध्ये आम्ही 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहोत, असेही प्रसाद यांनी सांगितले.
- तसेच 100 दिवसांमध्ये 5G सेवेचे परीक्षण, पाच लाख वाय-फाय हॉटस्पॉटवर काम करणे आणि दूरसंचार क्षेत्रातील उत्पादनांना प्रोस्ताहन देण्यालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामाच्या ठिकाणी महिलांनी पारंपारिक कपडेच घालावेत :
- राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी केवळ पारंपारिक कपडेच परिधान करावेत, असा नवा फतवा तामिळनाडू सरकारने काढला आहे.
- तर तामिळनाडू सरकारने परिपत्रकाद्वारे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याबाबत आदेश काढला आहे. या आदेशात म्हटले आहे की, कामावर असताना महिला कर्मचाऱ्यांना साडी, सलवार कमीज किंवा दुपट्ट्यासह चुडीदार असे कपडे परिधान
करण्यास परवानगी आहे. तर पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट, फॉर्मल पॅन्ट, वेश्टी (अर्थात लुंगी जे तमिळ संस्कृतीचं प्रतिकं आहे). किंवा कोणताही भारतीय पारंपारिक पोशाख परिधान करण्यास परवानगी आहे. - तामिळनाडू सरकारच्या या नव्या फतव्यामुळे महिलांना ट्राऊझर्स, जीन्स, टॉप यांसारखे कपडे कामावर येताना परिधान करता येणार नाहीत तर पुरुषांना टी-शर्ट, जीन्स असे कपडे वापरता येणार नाहीत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांकडून टीका केली जात आहे.
महिलांना बस आणि मेट्रोचा मोफत प्रवास :
- दिल्ली सरकारने महिलांसाठी बस आणि मेट्रोचा प्रवास मोफत केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.
- दिल्ली परिवहन मंडळाच्या बस, क्लस्टर बसेस आणि मेट्रो ट्रेनमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.
- याशिवाय शहरात 70 हजार सीसीटीव्ही लावले जाणार असल्याचंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
- तसेच यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ज्या महिलांनी तिकीट दर परवडतात, ज्यांना तिकीट खरेदी करणं शक्य आहे
- त्यांनी याचा लाभ घेऊ नये अशी विनंती केली आहे. ‘अशा अनेक महिला आहेत ज्यांना मेट्रो किंवा बसने प्रवास करणं
परवडतं. ज्यांनी तिकीट खरेदी करणं शक्य आहे त्यांनी याचा लाभ घेऊ नये. आम्ही आवाहन करतो ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकीट खरेदी करावं. ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना लाभ घेऊ द्यावा’.
6 जून रोजी RBI करणार मोठी घोषणा :
- 3 जून 2019 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक तीन जून, चार जून आणि सहा जूनपर्यंत चालणार आहे. बैठकीत जे ठरवलं जाईल, त्याची घोषणा 6 जून रोजी
होणार आहे. - तर या बैठकीत आरबीआय रेपो रेटसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. लागोपाठ तिसऱ्यांदा आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता आहे. या कपातीचा मोठा फायदा होणार असून, कर्ज स्वस्त होणार आहे.
- तसेच सध्या रेपो रेट 6 टक्क्यांवर आहे. रेपो रेट कमी करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असंही काही दिवसांपूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले होते. केंद्रीय बँकेनं आर्थिक वृद्धी होण्यासाठी या वर्षी फेब्रुवारी आणि
एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये 25-25 आधार (0.25 टक्के)ची कपात केली होती.
दिनविशेष :
- 4 जून 1674 मध्ये राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली.
- ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस 4 जून 1878 मध्ये युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
- हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे 4 जून 1896 मध्ये यशस्वी परीक्षण.
- 4 जून 1970 मध्ये टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- 4 जून 1979 मध्ये घानामधे लष्करी उठाव.
No comments:
Post a Comment