ATM मध्ये कॅश नसेल तर आता बॅंकेला होणार दंड :
- बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे.
- छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते.
जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटरची भारतात एन्ट्री :
- आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे.
- आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आला आहे.
- तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता 32 जीबी एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यात
आली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे. - प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे.
- यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे.
- देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे.
- डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे.
- डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतात
आणण्यात आला आहे.
ब्रिटनमधील ‘तंत्रव्हिसा’त भारत, अमेरिकेची आघाडी :
- इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.
- ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो.
- डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत 2018-19 मध्ये 45 टक्के वाढ झाली आहे.
- तसेच याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी 450 अर्ज आले होते. ही संख्या आता 650 वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.
- तर याविषयी याच आठवडय़ात ‘टेक नेशन’चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तंत्रज्ञानविषयक व्हिसासाठी येणारे सर्वाधिक अर्ज हे यंदाही भारत आणि अमेरिकेतून आले आहेत.
- यात सॉफ्टवेअर अभियंते, या क्षेत्रातील उद्योक विकासक, एआय-मशीन लर्निग, फिनटेक-एन्टरप्राईज, क्लाऊड सेक्टर यांचा समावेश आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
- तंत्रज्ञान व्हिसासाठी मोठय़ा प्रमाणावर अर्ज करणाऱ्यांत नायजेरिया, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे.
मेट्रोसाठी आता देशभरात ‘वन मेट्रो वन कार्ड’ :
- मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे.
- तर दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. तसेच अन्य राज्यांमध्ये या कार्डचा वापर करायचा असल्यास कार्ड केवळ काऊंटरवर नेऊन ते रिचार्ज करावे लागणार आहे.
- तसेच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. तसेच यासाठी बँकांची मदत घेता येणार आहे. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल.
- तर पुढील सहा महिन्यांमध्ये हे कार्ड लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतात फिरण्यासाठी किंवा कमी कालावधीसाठी वास्तव्यास येणाऱ्या लोकांना या कार्डाचा लाभ घेता येणार नसल्याची माहिती दिली.
- तसेच ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय हे कार्डही देण्यात येणार नाही. अशा लोकांसाठी पर्यायी कार्डाचा विचार सुरू असून त्यासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
एलिफंटाच्या सुरक्षिततेसाठी उभारणार संरक्षण भिंत :
- जेएनपीटीच्या भरावामुळे जागतिक कीर्तीच्या एलिफंटा बेटाच्या किनाऱ्याची झालेली प्रचंड धूप थांबविण्यासाठी जेएनपीटीने एलिफंटा बेटाच्या सभोवार सुमारे चार कि.मी. लांबीची संरक्षक भिंत उभारणीची योजना आखली आहे.
- 28.5 कोटी खर्चाच्या योजनेच्या निविदा जेएनपीटीने नुकत्याच प्रसिद्ध करून त्वरेने काम करण्याचे संकेत दिले आहेत.
- जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी सुरुवातीपासूनच समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे.
- समुद्रात भराव टाकण्याचे काम जेएनपीटीचे पाचवे बंदर उभारणीपर्यंत कायम सुरू राहणार आहे. मात्र. समुद्रात होणार्या भरावामुळे एलिफंटा बेटावरील समुद्रकिनार्यावरील समुद्राची पातळी वाढत आहे.
दिनविशेष :
- 1885 मध्ये न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.
- आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
- अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.
- 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
- 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
- 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला.
- राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झाले.
No comments:
Post a Comment